कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.
आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आहे की फोनचा अतिवापर करणाऱ्या ८०% लोकांमध्ये हा आजार दिसून येतो.
यात आपण आपलाच वेळ वाया घालवतो, सतत आपल्याला काहीतरी सुटून जाईल किंवा फोन येईल याची चिंता लागून राहते. मन यातच राहत आणि आपण फोन घेऊन बसतो.
जर हे कमी करायचं असेल तर काही गोष्टी करणं आवश्यक आहे.
१. फोनचा वापर कमी करा : आताच्या काळात फोन पूर्णपणे टाळणे तर शक्य नाही. पण, त्याचा वापर कमी करणं शक्य आहे. जिथे खरंच फोनची गरज नाही तिथे फोन बाजूला ठेवणे, दुसऱ्या कोणत्या तरी कामात राहणे हे आपण करू शकतो.
२. नोटिफिकेशन्स अडजस्ट करणे : फोनमध्ये कितीतरी ॲप्स असतात ज्यांचे सारखे नोटोफिकेशन येत राहतात, आणि आपलं लक्ष जात राहतं. जी ॲप्स कमी महत्त्वाची आहेत, त्यांचे नोटोफिकेशन काही काळाकरता बंद करणे ज्यामुळे आपले सतत लक्ष जाणार नाही.
३. रिंगटोन बदलणे: आपल्या फोनला ठराविक रिंगटोन असली आणि ती दुसरीकडे वाजली तरी आपला फोन वाजल्यासारखा आपल्याला वाटतं. त्यामुळे रिंगटोन काही वेळा बदलणे, ठराविक ठिकाणी फोन सायलेंट करणे हे ही उपाय यावर प्रभावी ठरतात.
४. फोन सोडून बाकी गोष्टींमध्ये मन रमवणे: फोनशिवाय देखील अश्या अनेक गोष्टी असतात, ज्या आपण छंद म्हणून जोपासल्या तर आपलं हे व्यसन कमी होऊ शकतं. बागेत फिरायला जाणे, लोकांसोबत गप्पा मारणे, काही ना काही कला शिकणे याने फोन आपोआप दूर होऊ शकतो.
५. थेरपिस्टची मदत: वरील कोणतेही उपाय कामी येत नसतील तर अश्या वेळी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणे आवश्यक आहे. जेणेकरून यातून होणाऱ्या नुकसानापासून आपण वाचू शकतो.

Comments
Post a Comment