आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे, पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू आणि मस्त पण राहू.
१. बागकाम: जितकं आपण निसर्गाशी जोडलेले राहू, तितके आपण निरोगी आणि आनंदी राहतो. नुसतं झाडांकडे पाहून देखील मन प्रसन्न होतं. याशिवाय झाड लावल्याने, त्यांचं पालन पोषण केल्याने काहीतरी मिळवल्याची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. Happy hormones स्त्रवतात. शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो. शिवाय जी झाड आपण लावतो त्याचेही अनेक फायदे होतात.
२. घरातल्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे : आता ज्याच्या त्याच्या हातात फोन असतो. त्यामुळे घरातल्या घरात प्रत्येकाचं विश्वच वेगळं झालं आहे. पण याने नात्यांमध्ये दुरावा होत आहे. असं व्हायला नको असेल तर आपल्या घरतल्यासोबत वेळ घालवला पाहिजे, त्यात व्यस्त राहिलं पाहिजे. त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारणं, दिवसभरात काय काय झालं हे सांगणं, जोक्स, काय प्रोब्लेम असतील तर ते सांगणं याने नात्यामधली बांधिलीकी टिकून राहते आणि एकटेपणाची भावना येत नाही.
३. मित्र, मैत्रिणी : चांगली मैत्री आपल्या आयुष्यात खूप मोठा प्रभाव पाडते. कारण बरेचदा ज्या गोष्टी आपण आपल्या घरातल्या माणसांसोबत शेअर करत नाही ते आपल्या मित्र मैत्रीणीना सांगतो, त्यांच्याकडे आपण मन मोकळं करतो. त्यांचं आपल्या सोबत असणंच आपल्याला खूप आधार देऊन जातं. आपल्या कामामुळे आपल्या दर वेळी वेळ आपल्या मित्रांसोबत वेळ घालवण शक्य होत नसलं तरी जेव्हा होईल तेव्हा त्यांच्यासोबत फिरायला जाणे, फोनवर बोलणे, मूव्ही पाहणे हे आपण करू शकतो.
४. वाचन : कितीही गेम्स येऊदेत, करमणुकीची विविध साधने येऊदे, वाचन ही अशी गोष्ट आहे जी कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. म्हणूनच तर आताच्या काळात डिजिटलीसुद्धा खूप चांगल्या पुस्तकांचा संग्रह आपण वाचू शकतो. चांगलं वाचन आपल्याला समृध्द करतं, आपल्याला दिशा दाखवते. कारण शब्दांची तेवढी ताकद असते. म्हणून चांगली चांगली पुस्तके वाचणे, त्यातून काहीतरी शिकणे आणि त्यात व्यस्त राहणे फायदेशीर आहे.
५. फिरणे: फिरणे, चांगल्या चांगल्या जागांना भेटी देणे हा अनुभव आपल्याला आतून बदलून टाकणारा आहे. कारण ह्या प्रवासातच आपण इतक्या नाव नवीन गोष्टी शिकतो, अनुभवतो जे आपण घरात बसून नाही घेऊ शकत. म्हणून प्रवास करणे, त्यात व्यस्त राहणे कधीही आपल्या मानसिक आरोग्याला चांगले आहे.

Comments
Post a Comment