असं कसं विनाकारण त्याने तुला त्रास दिला, तूच काहीतरी केलं असशील. गोष्टी एका बाजूने कधी होत नसतात आणि टाळी कधी एका हाताने वाजत नाही. काहीतरी केल्याशिवाय का त्याने /तिने असं केलं. भावंडांच्या अगदी साध्या भांडणापासून ते नात तुटायला येईल इथपर्यंत झालेल्या वादात अशी वाक्य आपण सर्रास ऐकतो. टाळी कधी एका हाताने वाजत नाही, थोडक्यात याचा अर्थ कोणतीही गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असतंच. विनाकारण काही होत नसतं.
पण हे वाक्य खरंच इथपर्यंतच मर्यादित आहे का? अजून कुठे याचा संदर्भ येतो? जरा खोलवर विचार केला तर बऱ्याच ठिकाणी येतो आणि हे आपल्याला समजलं तर आपल्या बऱ्याच समस्या सुटू शकतात, त्यांच्यावर उपाय शोधता येऊ शकतात. कसे ते पाहू...
जेव्हा आपल्यासोबत काहीही घटना घडते, काही प्रसंग घडतात किंवा आपण जेव्हा एखाद्या प्रसंगाला सामोरे जातो तेव्हा त्यातून ज्या आपल्या प्रतिक्रिया येतात त्यांना सर्वस्वी जबाबदार आपण त्या घटनेला, त्या प्रसंगाला ठरवतो. अगदी वरच्या गोष्टींमध्ये पण बहीण/भावाने तसे केले म्हणून मी असा वागलो. त्या वेळी तशी परिस्थिती होती म्हणून मी अशी reaction दिली. इथे पहिली टाळी म्हणून आपण त्या घटनेला जबाबदार ठरवतो. पण आपण स्वतःला कधी हा प्रश्न विचारला? माझ्या जागी माझे मित्र मैत्रीण असते, तर त्यांनी काय केलं असतं? एखादी तिसरी व्यक्ती असती तर तिने काय केलं असतं? तिने पण अशीच प्रतिक्रिया दिली असती ? अगदी साधं उदाहरण, एका मुव्हीला जाऊनही सर्वांना ती आवडते असं नाही, आवडली तरी प्रत्येकाने एकाच नजरेने पाहिलेली नसते. विचारल्यावर एक छान उत्तर येतं, आमचा pov (point of view) वेगळा होता.
हेच खर उत्तर आहे. फक्त मूव्ही नाही तर एकंदरीतच आयुष्याकडे पाहण्याचा, प्रत्येक प्रसंगाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा POV वेगळा असतो आणि म्हणूनच एकाच प्रसंगात प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या येतात. म्हणूनच एकाला दुःख देणारी घटना दुसऱ्याला देईल असं नाही. याचं कारण विचार वेगळ्या पद्धतीने केलेला असतो. हे समजल्याने दोन गोष्टी होतात. एकतर आपण आपल्या वागण्याची जबाबदारी पूर्णपणे परिस्थितीवर न टाकता स्वतःवर घ्यायला शिकतो आणि दुसरं म्हणजे आपल्याला हे समजत की विचार बदलल्याने आपल्या प्रतिक्रया पण बदलणार आहेत आणि त्यातून आपलाच त्रास कमी होत जातो.
त्यामुळे यापुढे जरी समोरून टाळी आली तरी त्यावर टाळी द्यायची की नाही हे आपण ठरवायचं आहे.
Comments
Post a Comment