गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः
ज्ञानरूपी अमृत देऊन, एका मातीच्या कच्च्या गोळ्याला सुबक मूर्तीचा आकार देण्याचं काम जो करतो तो म्हणजे गुरू. आपलं अख्ख आयुष्य घडविण्यात आपल्या गुरूचा खूप मोठा वाटा आहे. योग्य वेळी, योग्य वयात मिळालेला गुरू आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देऊन जातो आणि याच गुरूचा सन्मान करण्याचा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
आपले आई वडील, शिक्षक यांना आपण अनेकदा गुरू म्हणून केंद्रस्थानी मानतो जे खरं आहे. आपल्या आयुष्याला आकार देण्यात सर्वात मोलाचा वाटा यांचा असतो. पण याव्यतिरिक्त देखील असे गुरू आपल्या आयुष्यात येऊन जातात, जे आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि ज्यांच्याकडून आपण डोळसपणे शिकलं पाहिजे.
१. अनुभव: कोणी कितीही काहीही शिकवलं तरी अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरू आहे. जे आपण आपल्या अनुभवांमधून शिकतो ते आपल्याला कोणीही हात धरून शिकवू शकत नाही. फक्त हे शिक्षण तेव्हाच घेता येत जेव्हा आपण त्या अनुभवांना डोळसपणे, तटस्थपणे पाहायला शिकतो. एकदा ठेच लागली की पुन्हा जाताना काळजी घेणे ही शिकवण अनुभवानेच मिळते.
२. मित्र: आपण कोणाच्या संगीतत राहतो याने खूप मोठा फरक पडतो. आयुष्यात चांगले मित्र लाभणे याहून चांगली गोष्ट काय असू शकते? असे मित्र जे आपल्याला आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग दाखवतील, जे फक्त मैत्री म्हणून चुकीचा सल्ला देता योग्य काय आहे हे समजून घेऊन आपली कानउघडणी करतील. जे आपल्या प्रत्येक प्रसंगात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे मित्र आपल्याला गुरुसमानच आहेत.
३. निसर्ग : निसर्ग हा असा एक गुरू आहे जो आपल्याला प्रत्येक बदलला कसं सामोरं जायचं हे शिकवतो. सतत न चुकता बदलत जाणारे ऋतुमान आणि त्यानुसार स्वतः मध्ये बदल करत जाणारा हा निसर्ग. कोणतीही तक्रार नाही, फक्त स्वीकार. आयुष्यात ज्या काही वेगवेगळ्या घटना घडत असतात त्यांना घाबरून न जाता कसं स्वीकारावं, सामोरं जावं हे आपल्याला निसर्ग शिकवतो.
४. लहान मूल: सतत काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न, शोधण्याचा प्रयत्न आणि जरी अपयश आले तरी परत उठून पुन्हा ती गोष्ट करत राहणे. हा धीटपणा, ही चिकाटी, नवीन काहीतरी शिकण्याचा ध्यास लहान मुलांमध्ये हे सहज दिसून येत आणि त्यातूनच आपण या गोष्टी शिकतो. जसे मुल चालायला सुरू करत तसे कित्येकदा तरी पडते, तरी पुन्हा उठून चालायचा प्रयत्न करते. कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा उठून नव्याने सुरुवात करणे हे यातून आपण शिकतो.
५. साहित्य : शब्दांमध्ये किती ताकत आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. चांगली पुस्तके, चांगलं साहित्य आपले उत्तम मार्गदर्शक ठरू शकतात. त्यातील अनुभव, शिकवण समजून घेतली त्यानुसार आपल्या विचारांमध्ये, वागण्यामध्ये बदल घडवून आणला तर आपल्या आयुष्यात खूप चांगले बदल घडू शकतात.
अश्या या गुरूंकडून आपण खूप काही शिकून आपलं आयुष्य घडवू शकतो.

Comments
Post a Comment