Skip to main content

रव्याचे लाडू


अगं आई, जरा मला मदत करतेस का? खूप दिवसांपासून लाडू करायचं ठरवत होते पण वेळच मिळत नव्हता. आज कसही करून बनवायचं ठरवलं. पण अग हे काय जमुनच येत नाहीये बघ. आधी व्हिडिओ पाहिला, त्यात कसं मोजून मापून घालतात तसच घातलं. रवा नीट भाजला, तूप, साखर सर्व प्रमाणात पण तरी हे लाडू काही होत नाहीयेत. कंटाळून शेवटी तुला फोन केला. रश्मी एका दमात तिच्या आईशी सर्व बोलत होती. 

अगं हो, थांब थांब. जरा श्वास घे आणि माझं ऐक. आपण हे जे पदार्थ बनवतो ते अगदी आपल्या नात्यांसारखे असतात आणि नाती कधी मोजून मापून अगदी तंतोतंत सांभाळली जात नाहीत ग. नात्यांना जोडून ठेवण्यासाठी लागतो साखरेसारखा गोडवा आणि हा गोडवा तुझ्या त्या शुगर फ्री ने किंवा कमी पाकाने येत नाही. त्यासाठी तो पाक चांगला तयार व्हावा लागतो. नाती जोडताना, सांभाळताना घाई गडबड, असंयमी असून कसं होईल? तिथे संयम लागतोच. इथेही तसच आहे. रोज एकमेकांशी केलेलं बोलणं, एकमेकांना दिलेला आधार नात्यांमधला ओलावा टिकवून ठेवतो, त्यांच्यात कोरडेपणा येऊ देत नाही. तो कोरडेपणा येऊ द्यायचा नसेल तर लाडूमध्ये तूप नको का घालायला?  जी गोष्ट बांधून ठेवते तिचं कमी केली तर तो पदार्थ तरी कसा तयार होईल? आणि या गोष्टी टेबलस्पूनच्या नसून अंदाजाच्या असतात. नात्यांमध्ये कधी रुसवा फुगवा आला तणाव आला तर आपण प्रयत्न करतो की नाही नीट करण्यासाठी. तसच जर हे चमच्याचे अंदाज चुकत असतील, कमी पडत असतील तर आपल्याकडून प्रयत्न करून तो पदार्थ नीट करायची आपली तयारी लागते. मग त्यासाठी पडूदेत की थोड तूप जास्त. भाजुदेत ना तो रवा चांगला आणि होऊदे ना जरा गोड. नाहीतर मग आहेच ग टिकवायची म्हणून नाती नुसती ढकलण आणि खायचा म्हणून स्वतःच्या समधानाला पदार्थ कसातरी करून खाणं. त्यामुळे परत एकदा हे सर्व बघ. कुठे काय कमी पडलं ते पाहून त्यानुसार ते लाडू कर. मला खात्री आहे की तुला नक्की जमतील कारण तुला नाती चांगली सांभाळता येतात....

Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...