Skip to main content

जीभेचा वापर

इसाप चतुरस्त्र कथाकार, कवी आणि विनोदाचा पंडित होता. तो अत्यंत बुद्धिमान होताच, शिवाय द्रष्टा तत्त्ववेत्ताही होता. 'इसापनीती' या नावाने त्याच्या कथा प्रसिद्ध असून दोन-अडीच हजार वर्षांनंतरही त्याच्या कथांची मोहिनी माणसांच्या मनावर कायम आहे.

इसाप झांथसच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करत असे. एके दिवशी झांथसने आपल्या मित्रांसाठी मेजवानीचा बेत केला आणि इसापला उत्तम स्वयंपाक करण्याचा हुकूम दिला. इसापने बोकडाच्या जिभेचे नानाप्रकारचे अत्यंत रुचकर पदार्थ तयार केले. सर्व पाहुणे त्या पदार्थांवर तुटून पडले. पण इसापने पदार्थ तयार करताना बोकडाची केवळ जीभ वापरली या गोष्टीचा झांथसला राग आला. त्याने इसापला त्याविषयी विचारले असता इसाप म्हणाला, 'जगात जिभेइतकी चांगली गोष्ट दुसरी कुठलीच नाही.'

दुसऱ्या दिवशी झांथसने पुन्हा मेजवानी आयोजित केली. कालच्याच सर्व मित्रांना त्याने मेजवानीसाठी पुन्हा निमंत्रित केले आणि मुद्दामच मेजवानीसाठी सर्वात वाईट पदार्थ करण्यास इसापला सांगितले. सर्वजण पाहतात तर आदल्या दिवसाप्रमाणेच बोकडाच्या जिभेपासून बनवलेले नानाप्रकारचे पदार्थ ताटात वाढलेले होते. ते पाहून झांथस रागाने तो इसापला म्हणाला, 'अरे, काल तू जीभ सगळ्यात चांगली आहे असे सांगितलेस आणि आज तुला वाईट पदार्थ तयार करण्यास सांगितले तरीही तू तीच जीभ वापरलीस? आज ती वाईट कशी झाली?' तेव्हा इसापने उत्तर दिले, 'मालक, जगात जिभेइतका दुसरा चांगला पदार्थ आणि तिच्याइतका वाईट पदार्थही दुसरा कोणताच नाही.'

झांथस हुशार होता. इसापच्या बोलण्याचा मथितार्थ त्याच्या लक्षात आला. चांगल्या आणि वाईट गोष्टी एकच जीभ करते. प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आत्मीयतेचे, स्तुतीचे शब्द जी जीभ उच्चारते, त्याच जिभेतून संतापाची, निंदेची, द्वेषाची, विद्रोहाची भाषा प्रकट होऊ शकते. जीभ मनापासून स्तुती करू शकते आणि तीच जीभ मतलबी हेतूने खोटीनाटी स्तुती करते. जी एखाद्याचा गौरव करते तीच त्याची अप्रतिष्ठाही करू शकते. त्यामुळेच ती दुधारी शस्त्र असते. त्यामुळे जिभेचा वापर फार जपून केला पाहिजे. 

पण त्याआधी देखील काही महत्त्वाचं असेल तर ते आहेत आपले विचार. कारण आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्याप्रमाणे आपलं वागणं, बोलण आणि कृती असतात. विचाराचा प्रभाव आपल्या वर्तनावर, बोलण्यावर पडत असतो. जेव्हा जिभेतून म्हणजेच आपल्या वाणीतून काही चांगलं बाहेर पडत असत तेव्हा तिथे चांगल्या विचारांचा प्रभाव पडलेला असतो. 

आणि जेव्हा आपल्या तोंडातून वाईट, नकारात्मक काही बाहेर निघत असत तेव्हा तिथे चुकीच्या विचारांचा प्रभाव जास्त पडलेला असतो. जेव्हा एखादी व्यक्ती रागात बोलत असते तेव्हा तिच्या डोक्यात कुठेतरी समोरच्याने आपल्या मनासारखं वागलच पाहिजे, किंवा वागुच नये अश्या पद्धतीचे विचार असतात, असे आग्रह, अट्टाहास असतात. ते मोडले जातात म्हणून ती व्यक्ती रागावते. अश्या वेळी जर अट्टाहास न करता फक्त इच्छा व्यक्त केली तर रागाची तीव्रता कमी होईल आणि बोलण देखील नीट असेल.

म्हणूनच आपलं बोलण सुधारायचा असेल आणि जीभेचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करायचा असेल तर आधी विचार बदलायला पाहिजेत. विचारांचा वापर योग्य रीतीने केला तर जीभेचा वापर नीट होईल...


Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...