Skip to main content

स्वतःला दोष देताय???

नाही रे, मी खरंच वाईट माणूस आहे. काय उपयोग आहे माझा मुलगा म्हणून? काही करू शकत नाही मी माझ्या घरातल्यांसाठी? ना त्यांना काही देता येत, ना कुठे बाहेर घेऊन जाऊ शकतो. काय उपयोग आहे माझा सांग? एक मुलगा म्हणून, नवरा आणि बाबा म्हणून पण मी अपयशी आहे असं वाटतं मला. गिरीश अगदी हताश होऊन रवीला, त्याच्या मित्राला हे सर्व सांगत होता. पण रविलाच माहीत होतं की हे खर नाही. याचं कारण गिरीश जरी स्वतःला आता दोष देत असला, नावं ठेवत असला तरी त्याचे जे काही कष्ट आहेत, आपल्या कुटुंबासाठी तो ज्या पद्धतीने झटत होता ते सर्व रवी पाहत आला होता. कोणाचा आधार नसताना, मदत नसताना त्याने स्वतःच्या बळावर सर्व मिळवलं होतं, तयार केलं होतं. आता एकंदरीत परिस्थितीच अशी होती की काहीवेळा त्याला मुलांच्या गरजा, हौशी इच्छा असूनपण पूर्ण करता येत नसत. आता देखील त्याच्या मुलीला चिन्मयीला सहलीसाठी जायचं होतं. पण फी जास्त असल्याने त्याला तिला पाठवता आलं नाही. त्यामुळे ती हिरमुसून बसली होती. कामातून वेळ काढून घरातल्यांना त्याला फारसा वेळ देता येत नसे, आणि फार कुठे घेऊन जाता येत नसे. या सर्व गोष्टींचं त्याला दुःख होई. पण आज त्याचं हे दुःख बाहेर आलं याचं कारण त्याची मुलगी त्याला रागात तुम्ही चांगले बाबा नाही म्हणाली. कारण तिला सहलीला जाता आलं नाही. लहान मुलं, रुसली की काहीतरी बोलून जातात. पण गिरिशच्या मनाला ते इतकं लागलं की तो स्वतःलाच दोष देऊ लागला.

हे असं गिरीश नाही तर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. कितीही चांगलं करा, गोष्टी व्यवस्थित करा पण एखादी चूक झाली की आपण आपल्या माणूसपणावरच शंका घेऊ लागतो. काही ना काही दोष, नाव ठेवू लागतो. मी नालायकच आहे, मूर्ख आहे, वाईट, worthless आहे असं आपण स्वतःला म्हणू लागतो. खर तर त्या प्रसंगापुरती, गोष्टी किंवा परिस्थितीपुरती आपल्याकडून ती चूक झालेली असू शकते. पण याचा अर्थ आपण पूर्णपणे नालायक किंवा वाईट ठरू का? आपण नीट विचार केला, काही प्रश्न स्वतःलाच विचारले तर हे समजेल की अश्याच प्रसंगांना आपण याआधी कधी ना कधी नीट हाताळलेल आहे. त्यावेळी या गोष्टी नीट पार पडल्या आहेत. तेव्हा आपण स्वतःला खूप हुशार किंवा जेता म्हटलं का? नाही. मग जर  एक गोष्ट चांगली करून चांगलं म्हणत नसू तर एक चूक झाली तर आपण पूर्ण वाईट कसे ठरतो. यात काय तर्क आहे आणि यातून आपलं काय चांगलं होतं? उलट असं लेबल लावून आपण आपल्या क्षमतांना अजून कमकुवत करून टाकतो. 

हे असं करण्यापेक्षा जेव्हा गोष्टी चांगल्या केल्या तेव्हा नेमकं काय कामी आलं आणि आता जर चुकतात तर कमी काय पडतंय याचा विचार करा. दोष देण्यापेक्षा नेमकं काय चुकतंय, कोणतं कौशल्य कमी पडतंय ते पहा आणि सुधारायचा प्रयत्न करा. सर्व ठीक होण्याच्या शक्यता इथे जास्त आहेत.

Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...