Skip to main content

फोबिया

ए मी नाही येणार हा तिथे, मला अंधाराची भीती वाटते. सूर्यास्त पाहायचा तो पण इतक्या उंचावरुन, तूच जा बाबा. उंच ठिकाणी मला घाबरायला होतं. त्यांचा कुत्रा कसला भयानक आहे, अंगावरच येतो. मला जाम भीती वाटते कुत्र्यांची. सर्वसाधारणपणे, आपल्यापैकी प्रत्येकाला कसली ना कसली भीती ही असतेच. कारण ही भावना अगदी आदिमकाळापासून चालत आलेली आहे आणि आपल्या अस्तित्व टिकवण्याशी संबंधित आहे. एखाद्या गोष्टीने जेव्हा आपल्या जिवाला धोका आहे असे आपल्याला वाटते तेव्हा आपल्या मनात भीतीची भावना निर्माण होते ज्यातून आपण आपला बचाव करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो.

आदिमकाळात हिंस्र पशू, नैसर्गिक धोके यासारख्या गोष्टी, धोके सतत माणूस अनुभवायचा आणि तिथे ही भीतीची भावना त्याला मदत करायची कारण ती रास्त होती.

काळ सरकत गेला, सुरक्षिततेची साधने तयार झाली पण माणसाच्या मनातील भीती काही गेली नाही. आता जसं म्हटलं की भीती ही आपल्या अस्तित्व टिकविण्याच्या संबधित भावना असल्याने तो आपल्यामध्ये असली पाहिजे, पण प्रमाणात.

जिथे भीती असली पाहिजे तिथे असली पाहिजे. कारण ती नसली तर आपण स्वतःचा जीव धोक्यात टाकू आणि त्यामुळेच लहानपणीपासून आपल्या मनात बऱ्याच गोष्टींची भीती घालून ठेवलेली असते. कधी घाबरवयाला, तर कधी त्यापासून वाचायला. अंधार, उंची, खोल पाणी, साप अश्या काही गोष्टी आहेत ज्यांची भीती आपल्यापैकी बऱ्याच जणांना जाणवते आणि म्हणून आपण त्याच्या वाट्याला जात नाही. 

इथपर्यंत सर्व ठीक आहे. कारण या भीतीने आपलं काही नुकसान होत नाही, उलट आपण संरक्षित राहतो.

पण, ज्या गोष्टींपासून खर तर धोका होण्याची शक्यता पण नसते आणि असली तरी तिथे पुरेशी संरक्षक साधने आहेत, आपण त्याला पार करू शकतो, थोडक्यात त्यात आपल्या जिवाला काही धोका नाहीये अश्या गोष्टींशी थोडी नाही तर आत्यंतिक भीती वाटणं, इतकी की त्याच्या विचाराने, त्याच्या नुसत्या बोलण्याने अंगाचा थरकाप उडणे, घाम फुटणे, अस्वस्थ व्हायला होणे, त्यापासून जितकं शक्य तितकं लांब जाण्याचा प्रयत्न करणं असं जेव्हा होतं तेव्हा ती फक्त भीती राहत नाही, तर ती होते 'दुर्भिती '. ज्याला भयगंड आणि इंग्लिशमध्ये phobia असं म्हणतात. 



भीतीच्या पलीकडची टोकाची भावना, अवस्था ज्यातून एकप्रकारची विकृती निर्माण होते. ज्याला चिंता विकृती म्हणतात. भयगंड किंवा फोबिया हा चिंता विकृतीचा एक प्रकार आहे.

यामध्ये अनेकदा एका विशिष्ट गोष्टीची, कृतीची, वस्तूची, प्रसंगाची, प्राण्याची माणसाला अकारण भीती वाटत असते आणि त्यापासून पळ काढण्यासाठी व्यक्तीची धडपड सुरू होते. 

भयगंड होण्याचे कारण मेंदूमध्ये झालेला रासायनिक असमतोल आहे. त्याचप्रमाणे मेंदूतील अमिग्डला (भावनांचे केंद्रस्थान) व हिप्पोकॅम्पस या भागांत येते. पूर्वायुष्यात आलेला एखादा भयंकर अनुभव अश्या पद्धतीने मेंदूत पक्का बसतो की जेव्हा जेव्हा तसाच काही प्रसंग पुन्हा घडणार किंवा तशाच काही गोष्टीला सामोरे जावे लागणार असे वाटते, तेव्हा त्या व्यक्तीला पुन्हा तशाच शारीरिक व मानसिक लक्षणांचा अनुभव येतो जो पूर्वी आला होता. बहुतेक भयगंड हे निरर्थक व अवाजवी असतात. काहीतरी भयानक घडेल असे त्या व्यक्तीच्या मनानेच घेतलेले असते. 

जगात शेकडो प्रकारचे फोबिया अस्तित्वात आहेत. ज्यामध्ये बंद जागांची भीती, उंचीची, पाण्याची भीती, गर्दीची भीती आणि एका मुलीला तर चक्क बाहुल्यांची भीती वाटत होती. 

यामध्ये व्यक्तीचा श्वास गुदमरतो, आपण मरू की काय अशी भीती वाटते, हात पाय बधीर होतात, अंगाला घाम फुटतो, खूप अस्वस्थ वाटतं.

चिंता विकृतीच्या या प्रकारसाठी अनेक मानसोपचारपद्धती उपलब्ध आहे. ज्यामध्ये systematic desensitization म्हणजेच हळू हळू, पद्धतशीरपणे माणसाच्या मनातील भीतीला कमी करणे, cbt म्हणजेच बोधनिक वर्तन उपचारपद्धती जी माणसाच्या विचार वर्तन भावनांवर काम करते, EMDR तसेच वैद्यकीय उपचार यात वापरले जातात. 






Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...