Skip to main content

एक दिवस....फक्त माझा ,स्वतःचा !

         आज कामावर जायला खूप उशीर झालायं,लवकर आवरलं पाहिजे .अरे,किती काम पडलीत कधी होणार...उद्या submission ची शेवटची तारीख आहे ,लवकरात लवकर पूर्ण करायला हवं..असे आणि याहूनही अधिक विचार रोज आपल्या डोक्यात घोळत असतात .इतकी दमछाक होत असतानाही एक विचार सातत्याने डोक्यात येत असतो rather  आपण ठसवत असतो .हे सर्व कोणासाठी चाललयं? माझ्यासाठी ,माझ्या चांगल्यासाठी आणि जरी इतरांसाठी खूप काही करत असलो तरी ते इतर नसतात.ती आपल्या आयुष्याची महत्वपूर्ण नाती असतात .वेळ न पाहता सतत काही ना काही चालू असतं.थोडाफार वेळ मिळाला तरीही तो इतरांसोबत जातो.काहींच्या वाट्याला तेही येत नाही .आयुष्यभर सगळ्यातलं सगळं केलं जातं.परंतु असे काही क्षण जे फक्त स्वतःसोबत घालवायचे होते, स्वतः जगायचे होते ते मात्र निघून गेलेले असतात.
         असं म्हटलं जातं की आयुष्याचं खरं सार्थक आपण स्वतः बरोबर दुसरयांसाठी घालवलं कि होतं.परंतु या विचाराने काही जण स्वतःला पूर्णपणे विसरून केवळ दुसरयांसाठी जगतात.शेवटपर्यंत स्वतःचा शोध मात्र घेता येत नाही. इथे खरी गरज असते इतरांना काही काळ बाजूला करून स्वतःचा विचार करण्याची. स्वतःशीच बोलण्याची,स्वतःला समजून घेण्याची. स्वतः सोबत भांडायची, स्वतःवर रुसायची,स्वतःची स्तुती करण्याचीदेखील.यातून जे समाधान मिळतं ते पुढील काळाकरता आपल्याला खूप उपयोगी पडतं.
          म्हणून आपल्या रोजच्या कामातून असा एकतरी दिवस काढावा जो आपण स्वतः सोबत घालवू शकतो. त्या पूर्ण दिवसात फक्त एकटं राहायचं,फिरायचं,स्वतःशी गप्पा मारायच्या ,आपल्या खोड्या आठवून गालातल्या गालात हसायचं ,जे ठरवलं आहे त्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे ना याचा विचार करायचा. त्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करायचा .आपले असे छंद जे मागे पडले आहेत ते पुन्हा जगायचे.आपल्या छोट्या छोट्या इच्छांची bucket list तयार करायची, ती टप्प्याटप्प्याने पूर्ण करायची .त्या दिवसात आपल्याला जे जे करावसं वाटतं ते सर्व करावं. अगदी लहान व्हावसं वाटलं तेही व्हावं.
           हा स्वतःचा एक दिवस, हे असे अनेक दिवस तुम्हाला आयुष्य सुंदर जगायला प्रेरणा उर्जा देतात आणि जेव्हा तुम्ही आयुष्याच्या शेवटी मागे वळून पाहाल तेव्हा आपल्याकडून काही करायचं राहून गेले नाही ना असा प्रश्न पडत नाही आणि पडला तरी त्याचे उत्तर सकारात्मक मिळेल..



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...