Skip to main content

गोष्ट छोटी डोंगराएवढी

 एका जंगलात एक छोटासा ससा राहत होता. एक दिवस काय झालं जंगलात जोराचा वारा सुटला त्या वाऱ्याने झाडाचे एक पान तुटले , ढोलीत आले आणि सशाच्या डोक्यावर येऊन पडले. ससा मुळातच भित्रा त्यात डोक्यावर पान पडल्यावर तो अजूनच घाबरला आणि जंगलभर ओरडत सुटला की आभाळाचा एक तुकडा माझ्या डोक्यावर येऊन पडला. आभाळ तुटल, धावा, वाचवा! त्याच्याबरोबर त्याने इतर प्राण्यांनासुद्धा घाबरवून सोडलं. शेवटी जंगलातील एका बुद्धिमान प्राण्याने ढोलीत जाऊन पाहिले व खऱ्या गोष्टीची खात्री करून घेतली. 

भित्र्या सशाची ही गोष्ट आपण सर्वांनी ऐकली किंवा वाचली असेल.  या सशाप्रमाणेच आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात ज्यांना छोट्या छोट्या गोष्टी वाढवून सांगायची सवय असते. ज्याला आपण ' पराचा कावळा करणे' किंवा 'राईचा पर्वत करणे' असही म्हणतो. उदा. परीक्षेत १०मार्क जरी कमी झाले तरी," अरे बापरे! माझे  मार्क्स किती कमी झाले! आता माझं खूप नुकसान होणार". अर्धा तास जरी लाईट गेली तरी "अरे देवा! इतका वेळ मी अंधारात कसा राहणार"? अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतात. बऱ्याचदा या लोकांच्या तोंडात अरे बापरे! , किती वाईट , भयंकर , असे शब्द ऐकायला मिळतात. थोडक्यात, एखाद्या गोष्टीला जितकं महत्त्व द्यायला पाहिजे त्याहून जास्त महत्त्व देऊन त्याचा स्वतः त्रास करून घेतात व इतरांनाही घाबरवून सोडतात.

अशावेळी आपण थोडावेळ त्या गोष्टीवर विचार करण्याची गरज असते किंबहुना स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज असते. म्हणजेच आता जी गोष्ट घडत आहे किंवा घडली आहे ती खरोखर किती वाईट आहे? नीट विचार केला तर समजेल की मरणाइतकी तर नक्कीच नाही. मरणाइतकी का वाईट नाही, कारण एकदा माणूस मेला की तो काहीही करू शकत नाही. कोणत्याही गोष्टीवर काम करायची त्याची क्षमताच संपून जाते. परंतु जोपर्यंत आपण जिवंत असतो तोपर्यंत कोणत्याही प्रॉब्लेमवर आपण काम करू शकतो. जेव्हा ही गोष्ट आपल्याला समजते तेव्हाच एखाद्या गोष्टीचा जितका आपण त्रास करून घेतो तो  कमी होतो आणि आपण त्या प्रॉब्लेम वर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करायला लागतो.

जसे की, परीक्षेत मार्क्स कमी पडले ही गोष्ट जरी वाईट असली तरी मरणाइतकी भयंकर नाही हे जेव्हा आपण स्वतःला सांगणार तेव्हाच ते मार्क्स कसे कमी झाले व पुढे ते कसे वाढवता येतील यावर आपण विचार करणार.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...